“कन्याकुमारी मंदिर” – तीन समुद्राचे संगमक्षेत्र

भौगोलिक दृष्ट्या भारत जितका विस्तीर्ण आहे त्यापेक्षा कितीतरी पट विविधतेने नटलेला देश आहे. उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत भारत पसरलेला आहे असे पुष्कळदा आपण अभ्यासले असेल किंवा वाचनात नक्कीच आले असेल , एव्हाना पुष्कळदा कन्याकुमारीला भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून उल्लेखल्या जाते. हे कन्याकुमारी नेमके आहे तरी कसे व इथे काय विशेष असे आहे तेच नेमके ईथे आपण जाणून घेणार आहोत.

या लेखात आपल्याला भारताचा भौगोलिक विस्तार सोबतच भारताला जुळलेल्या सागरांची व सागरी मार्गे , तसेच प्राचीन काळापासून असलेल्या दाक्षिणात्य संस्कृती बद्दलची माहिती मिळेल, एक असे ठिकाण जिथे सृष्टीवरील नयनरम्य सूर्यास्त सोहळा अनुभवायची मज्जाच काही वेगळी असते अश्या जागेची आपणास ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दक्षिणात्य वास्तू कलेचा वेगळेपणा तसेच  कलेचा धर्मासोबत व तत्कालीन संस्कृतीशी घातलेला मेळ याचे जिवंत उदाहरण म्हणजे कन्याकुमारी देवी मंदिर होय, चला तर मग जाणून घेवूया अश्या सुंदर मनोहारी वास्तू व ठिकाणाबद्दल.

“कन्याकुमारी मंदिर” – तीन समुद्राचे संगमक्षेत्र – Kanyakumari Information in Marathi

कन्याकुमारी देवी मंदिर व स्थळाचा इतिहास – Kanyakumari History

कन्याकुमारी हे भारतातील तामिळनाडू या राज्यातील एक शहर आहे वस्तुतः कन्याकुमारी शहर एक बेट आहे जे तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेले आहे. जिथे तीन समुद्र ज्यामध्ये अरबी समुद्र, हिंद महासागर व बंगालचा उपसागर असे तीन समुद्र एकमेकास मिळतात त्यामुळे कन्याकुमारीला सागराचे संगम स्थळ म्हटल्यास गैर ठरणार नाही.

एका पौराणिक मान्यतेनुसार बाणासुर नामक राक्षसाला शिव शंकराने वर दिला होता की त्याचा वध फक्त अविवाहित कन्येद्वारा होईल, तत्कालीन भारतात भरत राजाचे राज्य होते ज्याला एक पुत्र व आठ कन्या होत्या. अश्या ९ संतती मध्ये राजा भरत ने आपले राज्य वाटून दिले होते ज्यामधील कन्याकुमारी हे क्षेत्र त्याच्या कुमारी ह्या मुलीला मिळाले होते.

कुमारीला पार्वती मातेचा अवतार मानण्यात येत होते जी शिव शंकराला आपला पती बनविण्यास इच्छुक होती व याकरिता तिने कठीण तपश्चर्या केली व शंकराला प्रसन्न केले, शंकराने तिला प्रसन्न होऊन तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव स्वीकार केला. परंतु तेव्हा नारद मुनी तिथे आले व त्यांनी सांगितले की जोपर्यंत कुमारी बाणासुराचा वध करणार नाही तोपर्यंत हा विवाह होणे शक्य नाही, याच दरम्यान बाणासुराला कुमारीच्या रूप सौंदर्याची माहिती मिळाली होती व तो कुमारीकडे विवाह प्रस्ताव घेऊन आला होता.

परंतु देवीने अट घातली तुला माझा पराभव करावा लागेल तरच मी तुझ्याशी विवाह करेल अन्यथा तुला माघारी परतावे लागेल, बाणासुर ह्या अटी करिता मान्य झाला व देवीने त्याचा पराभव करित त्याचा वध केला व त्याच कुमारी देवीला तेव्हापासून ‘कन्याकुमारी’ असे संबोधन होऊ लागले व तिचे मंदिर आज त्याच जागी आहे ज्याला आज भारतातील पर्यटन क्षेत्र म्हणून मोठ्या प्रमाणत महत्व प्राप्त झाले आहे.

कन्याकुमारी हे देवीचे १०८ शक्तीपीठामधील एक शक्तीपीठ म्हणून दर्जाप्राप्त धार्मिक स्थळ आहे जिथे पूर्वीपासून आजवर ज्यांना सन्यास मार्ग स्वीकारायचा आहे असे साधक येतात व सन्यास आश्रमाचा स्वीकार करतात.

कन्याकुमारी – एक सुंदर पर्यटन व धार्मिक क्षेत्र – Kanyakumari Tourist Places

कन्याकुमारीला आपणाला काही महत्वपूर्ण पर्यटन स्थळे मिळतील ज्यांची माहिती क्रमवारे खालील प्रमाणे आहे.

  • विवेकानंद रॉक मेमोरिअल – Vivekananda Rock Memorial

स्वामी विवेकानंदानी त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच रामकृष्ण परमहंसाच्या आदेशानुसार कन्याकुमारीला भेट दिली होती व अध्यात्मिक चेतनेला जन माणसात पोहोचवण्यासाठी काही काळ ईथे वास्तव्य केले होते आज त्यांच्याच स्मृती प्रीत्यर्थ इथे विवेकांनद रॉक मेमोरिअल म्हणून स्मारकाची निर्मिती करण्यात आली जिथे स्वामीजींच्या भेटी दरम्यानच्या आठवणी व तत्कालीन बाबींचा संग्रह इथे आढळतो. याव्यतिरिक्त ध्यान व साधना करण्याकरिता शांत मंडप रुपात कक्ष निर्मित करण्यात आलेले आहे. हे स्थळ समुद्र किनाऱ्या पासून ३०० मीटर इतक्या अंतरावर आहे, ज्याला वर्षभर लाखो पर्यटक व श्रद्धाळू भेट देतात व स्वामीजींच्या पवित्र स्मृतींना उजाळा देतात.

  • कन्याकुमारी मंदिर – Kanyakumari Temple

जवळ पास सर्वच प्राचीन धार्मिक ग्रंथांत व शास्त्रात उल्लेखित सुंदर वास्तुकलेचा कलाविष्कार असलेले कन्याकुमारी मंदिर हे या स्थळाचे प्रमुख केंद्रस्थान आहे. या देवीला भगवती अम्मन असे सुध्दा म्हणतात, ह्या मंदिराचा देवीच्या १०८ शक्तीपिठामध्ये समवेश आहे.

  • पद्मनाभपुरम पैलेस – Padmanabhapuram Palace

हा एक किल्ला असून त्रावणकोर शासकांचे हे निवासस्थान होते ज्याची निर्मिती ईसवी सन १६०१ साली झाल्याचा उल्लेख आहे, ह्या स्थळाचे महत्वाचे आकर्षण केंद्र म्हणजे ईथे वास्तू संग्राहलय असून ज्यात प्राचीन काळापासूनच्या तलवार, चित्रकला,तसेच विदेशी बनावटीच्या भांड्याचा याशिवाय लाकडी शस्त्राचा सुध्दा समावेश आहे.

  • सुचिन्द्रम – Suchindram

हे ठिकाण कन्याकुमारी पासून ११ किलोमीटर अंतरावर असून ज्याला मंदिराचे शहर म्हणून ओळख प्राप्त आहे,प्राचीन द्रविड शैलीतील मंदिर हे गोपूर वास्तू प्रकाराने सजविलेले इथे आढळतात. दक्षिणात्य वास्तुकलेचा धार्मिक मान्यतेनुसार केलेला सुंदर कलाविष्कार ईथे पहावयास मिळतो,त्यामुळे पर्यटकांचा ईथे ओढा पुष्कळ राहतो.

  • तिरुवल्लुर प्रतिमा – Thiruvalluvar Statue

तिरुवल्लुर नावाच्या प्रसिध्द तमिळ साहित्यकाराची १३३ फुट उंचीची भव्य प्रतिमा इथे आपणास पहावयास मिळते, प्रतिमेला सुंदर नक्षीकामाने सजविण्यात आले आहे.

  • गांधी स्मारक – Mahatma Gandhi Mandapam

महात्मा गांधी यांच्या चितेच्या अस्थी ह्या जागी ठेवून त्याला स्मारक रुपात घडविण्यात आलेले आहे , १९३७ साली महात्मा गांधी इथे आले होते व १९४८ साली कन्याकुमारीला त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ह्या स्मारकाला पर्यटक अवश्य भेट देतात .

तीन समुद्राचा वेढा सोबतच सुंदर मनोहारी सूर्योदय तसेच सूर्यास्त देखावा असे एक रमणीय ठिकाण म्हणून कन्याकुमारी ओळखल्या जाते. पर्यटनाच्या आनंदासोबत एक अध्यात्मिक अनुभूती नक्कीच कन्याकुमारीला भेट दिल्यावर येते जिथे सृष्टीचे सौंदर्य व भौगोलिक विविधता ह्यांची आकर्षक सांगड असल्याचा भास होतो. नक्की अश्या सुंदर स्थळाला अवश्य एकदा भेट द्यावी व आमच्या लेखातून आपल्याला माहितीद्वारे कन्याकुमारी बद्दल आकर्षण वाढल्यास नक्कीच ईतर माहितीपर लेखांचे वाचन करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top