Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या महाराष्ट्राने जन्माला घातलेल्या प्रसिध्द व्यक्तींबद्दलची माहिती

Maharashtratil Prasidh Vyakti

“बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’’ महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे या महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, चोखामेळा, मुक्ताबाई, जनाबाई याच मातीतल्या. शिवाजी महाराजांसारखा लढवय्या राजा याच भुमीत जन्माला आला जो रयतेचा राजा ठरला त्यानं त्याच्या कार्यानं आपलं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरलं.

तर अशा या महाराष्ट्राने त्यानंतर देखील आजतागायत अश्या विभुती जन्माला घातल्या आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने आपला नावलौकीक चोहीकडे पसरवला आहे. त्यांच्या कार्याचा दरवळ सर्वदुर पसरला आणि महाराष्ट्राचे नाव चारी दिशांना सर्वश्रृत झाले.

आज आपण महाराष्ट्राने जन्माला घातलेल्या प्रसिध्द व्यक्तींबद्दल जाणुन घेणार आहोत. त्यांची क्षेत्र जरी वेगवेगळी असली तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात असं काही केलं की ते अजरामर झालेले आहेत कितीतरी पिढया येत जात राहतील पण कुणास ठाउक त्यांनी गाठलेल्या उंचीपर्यंत कुणाला पोहोचता येईलही की नाही.

महाराष्ट्रातील प्रतिभावंत लोकांविषयी माहिती – Information About Famous Personalities of Maharashtra

Famous Personalities of Maharashtra

महाराष्ट्रातील 8 प्रसिद्ध लोकांची यादी – Famous Personalities of Maharashtra with Name List

  • दादासाहेब फाळके – Dadasaheb Phalke

दादासाहेब फाळके भारतात चित्रपटाचे पहिले निर्माता आणि दिग्दर्शक आहेत त्यांनी भारतात चित्रपटांची सुरूवात करून भारतीय संस्कृतीला संपुर्ण देशात पाहोचवलं आणि त्यांच्या या अतुल्य योगदानाकरता भारत त्यांचा कायम ऋणी राहील. भारत सरकारनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू करून भारतीय चित्रपटांचा जनक म्हणुन त्यांना अमर केलं आहे.

दादासाहेबांनी चित्रकले सोबतच फोटोग्राफी आणि स्थापत्यकलेचे देखील शिक्षण घेतले होते, इंग्रजी चित्रपट इसा मसीह बघीतल्यानंतर त्यांच्या मनात चित्रपट सृष्टीत प्रवेश घेण्याचा विचार आला. आर्थिक अडचणीतुन जात असतांना देखील त्यांनी इंग्लंड ला जाऊन चित्रपटासंबधीची उपकरणं आणि मशीनस आणण्याचा निर्धार करून तो अमलात आणला.

त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेला पहिला चित्रपट म्हणजे “राजा हरिश्चंद्र’’. हा चित्रपट तयार करतांना दादासाहेबांना स्टुडिओ निर्माणापासुन ते पटकथा, फोटोग्राफी, निर्माता आणि दिग्दर्शन या सर्व भुमिका पार पाडाव्या लागल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुर, लंकादहन, श्रीकृष्णजन्म, कालिया मर्दन, बुध्ददेव आणि सेतुबंधन या चित्रपटांचे निर्माण केले पण त्यानंतर मात्र मुकचित्रपटांचा काळ संपला होता.

दादासाहेबांनी गंगावतारम नावाचा हिंदी आणि मराठी भाषेतला बोलता चित्रपट तयार केला तोपर्यंत मात्र चित्रपटाच्या क्षेत्रात बर्याच जणांचे आगमन झाले होते पण भारतीय चित्रपटसृष्टी दादासाहेब फाळकेंच्या योगदानाला कधीही विसरू शकणार नाही.

दादासाहेब फाळकेंविषयी काही महत्वपुर्ण माहिती –  Dadasaheb Phalke Information

  • संपुर्ण नाव: धुंडीराज गोविंद फाळके
  • जन्म: ३० एप्रील १८७० (त्र्यंबकेश्वर नाशिक)
  • मृत्यु: १६ फेब्रुवारी १९४४
  • पहिला चित्रपट:  राजा हरिश्चंद्र

त्यांच्या सन्मानार्थ डाक विभागानं १९७१ साली डाक तिकीट प्रकाशित केले.

अवघ्या १९ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी ९५ चित्रपट आणि २६ लघुचित्रपट बनवलेत.

  • बाबा आमटे – Baba Amte

बाबा आमटे भारतातील प्रमुख आणि सन्मानित समाजसेवी आहेत, समाजाने वाळीत टाकलेल्या आणि कृष्ठरोग्यांना त्यांनी जवळ केलं त्यांच्याकरता अनेक आश्रमांची निर्मीती देखील केली त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर नजीकच आनंदवन प्रसिध्द आहे. या सोबतच बाबांनी इतरही सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतला ज्यात वन्यजिवांचं संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन हे प्रमुख आहेत.

बाबांनी वकीलीचा अभ्यास केला होता त्यानंतर स्वातंत्र्यलढयात त्यांनी उडी घेतली. स्वातंत्र्यलढयातील सैनिकांकरता बाबा बचाव पक्षाचे वकील म्हणुन काम करायचे. ब्रिटीश सैन्यापासुन एका मुलीला बाबांनी वाचवल्याचे महात्मा गांधीना जेव्हां समजले तेव्हां त्यांनी बाबांना “अभय साधक’’ असे नाव दिले.

कुष्ठरोग्यां करता बाबा देवदुतच ठरले. ज्यावेळी समाजामधे या रोगाविषयी अनेक गैरसमज पसरले होते त्यावेळी बाबांनी या रोग्यांना जवळ करून त्यांच्यावर उपचार करत लोंकामध्ये असणारे गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न केला. गरीबांची सेवा आणि त्यांच्या सशक्तीकरणाकरता बाबांनी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली. १९४९ मधे आनंदवनात एका झाडांखाली बाबांनी रूग्णांची सेवा सुरू केली, मदिया गोंड समुदायाकरता लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला

बाबा आमटेंविषयी महत्वाची माहिती – Baba Amte Information

  • जन्म: २६ डिसेंबर १९१४ हिंगणघाट (वर्धा)
  • मृत्यु: ९ फेब्रुवारी २००८ (आनंदवन)
  • पत्नी: साधनाताई आमटे
  • मुलं:  डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे

बाबांना त्यांच्या अतुल्य कार्याकरता १९७१ ला पद्मश्री, १९८५ ला रमन मॅगसेसे, १९८६ ला पद्मविभुषण यांसारखे बरेच पुरस्कार मिळाले आहेत.

  • सिंधुताई सपकाळ – Sindhutai Sapkal

सिंधुताईंचं आयुष्य म्हणजे जीवंतपणी निखा.यावर चालणं काय असतं त्याचं मुर्तीमंत उदाहरण आहे. आयुष्य सुरू झाल तेच मुळात ‘नकोशी’ च्या रूपात वर्धा जिल्हयात नवरगावी ही कन्या अभिराम साठेंच्या घरी जन्माला आली खरी पण दुर्लक्षीतच राहीली.

सिंधुताईंना घरी चिंधी म्हणत (कापडाचा फाटलेला तुकडा) वडलांचे प्रेम मिळाले पण आईचा दुसवास सहन करत करतच ती मोठी झाली वडिलांच्या प्रेमामुळे त्या ४ थी पर्यंत शिक्षण घेवू  शकल्या.

वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी ३० वर्षाच्या श्रीहरी सपकाळ सोबत तीचे लग्न लावुन देण्यात आले. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत सिंधुताई ३ मुलांची आई देखील झाली होती. जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळवण्याकरता ताईंनी पहिले बंड पुकारले त्यात त्यांचा विजय झाला पण जमिनदार दुखावल्याने त्याने सिंधुताईंच्या पोटातले मुल आपले असल्याचे सांगुन तिच्या पतिचे कान भरले. नवऱ्याने तीला मारून मारून हाकलुन दिले.

सिंधुताईंनी गोठयात मुलीला जन्म दिला. अनाथांचे जीणे जगता जगता ताई अनाथांची माय झाल्या, आपल्यासारख्याच अनाथांना गोळा करत ताईंनी अक्षरशः भिक मागुन त्यांची पोटं भरली. परभणी नांदेड मनमाड या रेल्वेस्थानकावर ताई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या आणि आज जवळजवळ १४०० पेक्षा जास्त मुलांची सिंधुताई आई झाल्या आहेत. त्यांच्या नावावर आज ६ संस्था सुरू आहेत,

सिंधुताईंना आज २०७ जावई आणि ३६ सुना आहेत १००० हुन जास्त नातवंडं आहेत. आज ताई कुणाकडुन मदत मागण्यापेक्षा आपल्या मनोगतातुन निधी जमा करण्याकरत प्रयत्नरत असतात. सिंधुताईंना ५०० पेक्षा जास्त पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या ओळींप्रमाणे अनाथांकरता सिंधुताई सपकाळ आज देवदुतच ठरल्या आहेत.

  • लता मंगेशकर – Lata Mangeshkar

“मेरी आवाजही पहेचान है.. गर याद रहे’’… आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गानकोकीळा लता मंगेशकर यांना चित्रपटसृष्टीत येवून ७ दशकांचा काळ लोटला १९४२ पासुन सुरू झालेला त्यांचा गायनप्रवास कित्येक दशकं रसिकांच्या मनावर गारूड करत राहीला आहे.

आजतागायत लता दिदींनी १००० पेक्षा जास्त चित्रपटांमधे गाणी गायली आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी जवळजवळ ३६ भाषांमध्ये गायन केलं आहे पण सर्वात जास्त त्या हिंदी आणि मराठी भाषेत गायल्या.

१९८९ साली लता मंगेशकरांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांना भारतरत्न पुरस्कार देउन सरकारनं त्यांचा यथोचित सत्कार केलाय.

लता मंगेशकरांची काही महत्वपुर्ण माहिती – Lata Mangeshkar Information

  • जन्म २८ सप्टेंबर १९२९.
  • सर्वात जास्त गित गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे (१९७४).
  • लता मंगेशकरांना गाण्या व्यतिरीक्त स्वयंपाक करण्याची आणि फोटोग्राफी करण्याची आवड आहे.
  • गाण्याला नेहमी लता मंगेशकरांनी परमेश्वराच्या स्थानी मानले, गाणे गातांना त्या कधीही पायात चपला ठेवत नसत.
  • लतादिदिंना क्रिकेट ची देखील खुप आवड आहे.
  • विजय भटकर – Vijay P. Bhatkar

पहिल्या सुपर कॉम्प्यूटर “परम’’ चे निर्माता श्री विजय भटकर विज्ञानाचे आणि आयटी चे प्राध्यापक आहेत. भारतीय सुपर कॉम्प्यूटर मधे त्यांचे अतुल्य योगदान आहे. विजय भटकर सी.डेक या सुपर कम्प्युटिंग शी संबधीत कंपनीचे ते कार्यकारी निर्देशक देखील आहेत, सध्या ते नालंदा विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणुन जवाबदारी सांभाळत आहेत त्यांचा कार्यकाळ तिथे 25 जानेवारी 2017 पासुन 3 वर्षांकरता सुनिश्चित आहे.

विजय भटकरांची आय टी लिडर अशी देखील ओळख आहे. विजय भटकरांना पद्भुषण, महाराष्ट्र भुषण पुरस्कार, संत ज्ञानेश्वर विश्व शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विजय भटकर यांच्याविषयी महत्वाची माहीती – Vijay P. Bhatkar Information

  • जन्म ११ ऑक्टोबर १९४६.
  • सी.डॅक चे संस्थापक आणि पहिले कार्यकारी संचालक.
  • परम कार्यक्रम व लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुलचे मदतनीस आणि सल्लागार.
  • भारत सरकारच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य.
  • अमृता विद्यापिठाचे सदस्य.
  • भारतातील लीडिंग टेक्नोलॉजीष्ठ.

अण्णासाहेब चिरमुले स्मृति पुरस्कार (२००३), इंडियन जिओटेक्निकल सोसायटी चे सुवर्णपदक (१९७९), इलेक्ट्रोनिक मॅन ऑफ द इयर (१९९२), १९९८ चा दुबईचा ईबिझ इनोव्हेशन कॉन्टेस्ट पुरस्कार (या स्पर्धेला ३५ देशातुन १३२५ जणं आले होते, त्यांत विजय भटकर हे पहिले आले) या व्यतिरिक्त त्यांना आजतागायत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

  • सचिन तेंडुलकर – Sachin Tendulkar

सचिन रमेश तेंडुलकर असे भारतीय क्रिकेटपटु आहेत ज्यांच्या नावावर इतके रेकॉर्ड्स आहेत की कोणत्याही क्रिकेट प्लेयर ला त्यांची बरोबरी करणं जवळपास अशक्यच आहे आणि त्यामुळेच सचिन क्रिकेटचा देव मानल्या गेला आहे. क्रिकेटच्या इतिहासात सचिन जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणुन आज ओळखल्या जातो.

आजची युवापिढी सचिन सारखा होण्याचा प्रयत्न करतांना दिसते. शांत आणि संयमी स्वभाव हा सचिन तेंडुलकरचा आणखीन एक स्वभावगुण. सचिनला ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवण्यात आले आहे आणि हा पुरस्कार घेणारा तो पहिला खेळाडु आणि सगळयात कमी वयाचा आहे. ‘राजीवगांधी खेल रत्न पुरस्कार’ मिळवणारा तो एकमात्र पहिला क्रिकेट खेळाडु आहे.

सचिन तेंडुलकर विषयी काही महत्वपुर्ण माहिती – Sachin Tendulkar Information

  • जन्म २४ एप्रील १९७३ मुंबई.
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुहेरी शतक करणारा पहिला खेळाडु.
  • मीरपुर इथं १६ फेब्रुवारी २०१२ ला बांग्लादेश विरूध्द १०० वे शतक पुर्ण केले.
  • ऑस्ट्रेलिया विरूध्द ५ नोव्हें २००९ ला १७५ रन करून क्रिकेट मधे १७००० रन पुर्ण करणारा पहिला खेळाडु ठरला.
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वकप स्पर्धेत सर्वात जास्त रन.
  • टेस्ट क्रिकेट मधे सर्वाधीक रन बनवण्याचा किर्तीमान देखील सचिन च्या नावावरच आहे.
  • एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच मिळवणारा खेळाडु.
  • माधुरी दिक्षीत – Madhuri Dixit

एक सुंदर चेहरा ज्याने लाखो लोकांना आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर वेड लावलं. आपल्या अभिनयानं छोटयात छोटया भुमिकेत असा जीव ओतला की ते पात्र नेहमीकरता सिनेरसिकांच्या मनावर कोरलं गेलं.

राजश्री प्रोडक्शन च्या अबोध या चित्रपटापासुन सुरू झालेला माधुरी दिक्षीत चा अभिनय प्रवास आजही सुरू आहे. अभिनयासोबतच नृत्यात निपुण असलेली माधुरी आज अक्टींग सोबतच नृत्याचेही धडे देते आहे.

अबोध हा तिचा पहिला चित्रपट जरी फ्लॉप झाला तरी त्यावेळी समिक्षकांकडुन मात्र तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर लागोपाठ आलेले आवारा बाप, स्वाती, मानव हत्या, मोहरे, हिफाजत, उत्तर दक्षिण लागोपाठ फ्लॉप झालेत त्यानंतरच्या दयावान आणि खतरो के खिलाडी लाही म्हणावे तसे यश मिळाले नाही..

अपयशाने पाठ सोडली ती एन.चन्द्रांच्या ‘तेजाब’ पासुन. तेजाब हया चित्रपटाने माधुरी ला खरी ओळख मिळवुन दिली. एक दो तिन म्हणत मोहिनी सिनेरसिकांच्या गळयातला ताईत बनली तीने पुन्हा मागे वळुन पाहिले नाही. त्यानंतर रामलखन, त्रिदेव हे चित्रपट देखील सुपर हिट ठरले.

१९९० साली आमिर खान सोबत प्रदर्शित झालेल्या दिल या चित्रपटाने माधुरी दिक्षीत ला पहीला बेस्ट अक्ट्रेसचा फील्म फेयर अवार्ड मिळाला..

त्यानंतर एकामागोमाग साजन, बेटा, खलनायक, या चित्रपटांनी तीला भरपुर प्रसिध्दी मिळवुन दिली. अंजाम चित्रपटात तिचे वेगळेच रूप पहायला मिळाले. “हम आपके है कौन’’ या चित्रपटाने तर चित्रपट सृष्टीतल्या सगळयाच चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. सलग ७ ते ८ वर्ष हा चित्रपट सिनेमाघरांमध्ये झळकत होता.

मध्यंतरीच्या काळात लग्न आणि मुलाबाळांच्या संगोपनामधे व्यस्त झालेली माधुरी नव्या दमाने पुन्हा चित्रपटसृष्टीत काम करू लागली आहे. नवे नवे चित्रपट, डान्स शोज्, टिव्ही शोज्, मधे ती व्यस्त आहे. पुन्हा आपली नवी इनिंग ती खेळु पाहते आहे.

  • पु.लं देशपांडे – Purushottam Laxman Deshpande 

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व म्हणजे पु.लं देशपांडे होय. पु.लं मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक देखील होते. पु.लं नी पुण्यातील फग्र्युसन कॉलेजात आणि सांगलीतील विलिग्ंडन कॉलेज मधुन आपले शिक्षण पुर्ण केले. बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी पु.लं यांनी सुरूवातीला काही काळ कॉलेज मधे प्रोफेसर आणि शाळेत शिक्षक म्हणुन काम केलं होतं.

पु.लं चं लिखाण आवडणारा आणि मनापासुन वाचणारा फार मोठा वाचक वर्ग आहे त्यांच्या विशेष पुस्तकांमधे असा मी असा मी, अपुर्वाई, अघळ पघळ, बटाटयाची चाळ, भाग्यवान, भावगंध, चार शब्द, दाद, एक शुन्य मी, एका कोळीयाने, गणगोत, गोळा बेरीज, गुण गाईन आवडी, हसवणुक, जावे त्याच्या देशा, खिल्ली, मैत्र ही पुस्तकं वाचकांच्या पसंतीस उतरली. पुलं नी रेडीओवर भाषणं देखील दिलीत त्याला ही खुप पसंती मिळाली.

त्यांच्या बटाटयाची चाळ चे एकपात्री प्रयोग रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेत. त्यांची तुका म्हणे आता, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार ही नाटकं देखील त्या काळात खुप गाजलीत. पुलं नी चित्रपटांकरता लेखनच नाही तर बऱ्याच भुमिका निभावल्या संगीतकार, अभिनय, नेपथ्या पासुन तर दिग्दर्शनापर्यंत सगळयाच गोष्टींचे त्यांना चांगले ज्ञान होते. मराठी साहित्य आणि संगीता व्यतिरीक्त पुलं चे आकाशवाणी, दुरदर्शन, नाटयक्षेत्र आणि चित्रपटातले योगदानही अतुलनीय असे आहे.

पु.लं बद्दल काही विशेष माहिती – Purushottam Laxman Deshpande Information

  • जन्म: ८ नोव्हेंबर १९१९ मुंबई.
  • मृत्यु: १२ जुन २००० पुणे.
  • पुरस्कार:- पद्मश्री, महाराष्ट्र भुषण, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

अश्या महान व्यक्तींना आपल्या कुशीत जन्म देणारी महाराष्ट्राची भूमी आहे, या भूमीला शत शत नमन. आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो.

असेच कित्येक नामवंत व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातील आहेत, पण या लेखामध्ये त्यांच्या विषयी  लिहिणे शक्य नाही, आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर आम्हाला कळवा आम्ही नक्की आणखी नामवंत व्यक्तींची माहिती घेऊन आपल्या पर्यंत येऊ. तसेच या लेखाला आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved